Description
आपले स्वतंत्र विश्व निर्माण करताना बहुजनांनाही खूप पथ्ये पाळावी लागतील. नव्या समाजाच्या निर्मितीसाठी अपार कष्ट करावे लागतील, आळस झटकावा लागेल, निष्क्रियता टाकावी लागेल, ज्ञानार्जन करावे लागेल, इतरांशी सहकार्य करण्याची भावना ठेवावी लागेल, इतरांच्या व्यक्तित्वाचा आदर करायला शिकावे लागेल. तत्त्वासाठी प्रखर संघर्ष करतानाही आपली भाषा विवेकाची, सौजन्याची ठेवावी लागेल. दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करीत असतानाच आपल्याकडून इतरांवर आणि विशेषतः आपल्याहून दुर्बल असलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. आत्मनिरीक्षण करून आपले दोष दूर करायचे आणि आपल्या ठिकाणी असलेल्या सुप्त शक्तींचा विकास करायचा, यासाठी धडपडावे लागेल. आपल्या समाजातील इतरांच्या विकासालाही हातभार लावावा लागेल. थोडक्यात म्हणजे कसे बोलावे, कसे वागावे, या विषयीचे नियम स्वतःच तयार करावे लागतील. दुसऱ्याने जबरदस्तीने लादलेल्या बंधनातून मुक्त होत असतानाच स्वतः निर्माण केलेल्या लवचिक व विधायक बंधनात बांधून घेऊन स्वतःच्या जीवनाला एक शिस्त लावणे आणि तिच्याद्वारे स्वतः सह इतरांचे जीवन सुगंधाने भरून टाकणे, हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे.
डॉ.आ.ह.साळुंखे






Reviews
There are no reviews yet.