Description
‘अमर्त्य सेन : अर्थशास्त्राचा मानवी चेहरा’ हे प्रस्तुत पुस्तक ज्यांनी आपल्या हाती दिले आहे, ते प्रा. अर्जुन जाधव गेली सुमारे चाळीस वर्षे विविध परिवर्तनवादी चळवळींमध्ये एक समतावादी भूमिका घेऊन आणि सामाजिक बांधिलकी मानून सक्रिय राहिलेले आहेत. स्वाभाविकच, केवळ भारतीयच नव्हे, तर जगातील सर्वच गोरगरीब, दारिद्रयाने पीडलेले, तसेच शोषणाच्या इतर समस्यांनीही त्रस्त झालेले लोक माणूस म्हणून आपले जीवन अधिक आनंदी कसे करू शकतील, याचा आयुष्यभर ध्यास घेतलेले आणि त्यांच्या कल्याणासाठी आपल्या अर्थशास्त्राच्या व्यासंगाचा अखंडपणे प्रयोग करीत आलेले डॉ. अमर्त्य सेन त्यांना प्रेरणास्वरूप बनावेत, हे अगदी स्वाभाविक आहे. मला स्वतःलाही अमर्त्य सेन हे अत्यंत आदरणीय, किंबहुना माझे श्रद्धास्थान वाटत आले आहेत. तथागत बुद्धांपासून महात्मा बसवेश्वर, सर्व वारकरी संत, संत कबीर, गुरू नानकदेव, संत रवीदास, आधुनिक काळातील फुले दाम्पत्य, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा इ. महामानवांपर्यंत करुणेचा जो अगाध प्रवाह वहात आलेला आहे, तो अमर्त्य सेनांच्या आचारविचारात अगदी स्पष्टपणे दृष्टीस पडतो. प्रा. जाधव यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट होते आणि ती म्हणजे अमर्त्य सेनांनी अर्थशास्त्राला सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाच्या दिशेने एक आगळे व अभूतपूर्व असे वळण दिलेले आहे. ही भूमिका घेऊन त्यांनी केलेल्या अर्थशास्त्राच्या चिंतनाला नोबेल पारितोषिक मिळाले, हे तर गौरवाचे आहेच पण त्यांच्या आधी ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता, त्यांना तो दोघातिघांमध्ये विभागून मिळत होता. पण डॉ. अमर्त्य सेनांना मात्र तो कोणाशीही विभागून नव्हे, तर केवळ एकट्याला मिळाला, हे त्याचे खास वैशिष्ट्य होय. प्रा. जाधव यांनी हे पुस्तक लिहून सामान्य लोकांच्या कल्याणासाठी धडपडणाऱ्या एका महान व्यासंगी विद्वानाचे चरित्र आणि कार्य आपल्यासमोर अत्यंत ठळकपणे मांडून अतिशय उत्तम कार्य केले आहे. त्यांची ही मांडणी पूर्णांशाने साधार, वस्तुनिष्ठ आणि यथार्थ आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या हातून यापुढेही असेच उत्तमोत्तम लेखन घडावे, ही सदिच्छा व्यक्त करतो.
आ.ह.साळुंखे






Reviews
There are no reviews yet.