Description
राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सुधारणा आपोआपच होतील या गोंडस तत्वावर ‘प्रबोधना’चा मुळीच विश्वास नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीच्या आचारविचारांनी चिडचिडलेली, बौद्धिक क्षेत्रात जाणतेपणाचा मक्ता मूठभर सुशिक्षितांच्या हाती, बाकी सर्वत्र अज्ञानाच्या अमावास्येची काळीकुट्ट रात्र, औद्योगिक चतुराई ठार मेल्यामुळे आर्थिक बाबतीत सर्वत्र पसरलेले दैन्य आणि दास्य अशा विचित्र परिस्थितीत राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे राजकारणाचा जुगार खेळणाऱ्या जुगारांची सट्टेबाजी होय. अर्थात या जुगारात येनकेन प्रकारे हिंदुस्थानच्या स्वराज्याचे तट्ट यदाकदाचित जिंकलेच तर ती स्वराज्याची लॉटरी म्हणजे मूठभर मोठ्या माशांना बाकीच्या अनंत धाकट्या मासोळ्यांना विगरपरवाना गिळण्याचा सनदपट्टाच होय ! यात आम्हांला संशय वाटत नाही. सामाजिक उच्चनीच भेदभाव, आपण व आपला समाज इतर सर्व समाजांपेक्षा उच्च दर्जाचा मानण्याची नाना फडणीसी आणि धार्मिक क्षेत्रात भिक्षुकशाहीची दिवसाढवळ्या चाललेली भांगरेगिरी, या सर्व राष्ट्रविनाशक, समाजविध्वंसक व दास्य प्रवर्तक दोषाचा आमूलाग्र नायनाट झाल्याशिवाय स्वराज्याचे अमृत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी हिंदुस्थानच्या घशात कोंबले तरी त्यापासून त्याचा लवमात्र उद्धार होणार नाही.
– प्रबोधनकार ठाकरे






Reviews
There are no reviews yet.